Tuesday, 18 March 2025

श्री

 श्री 


जाणीव आणि विचार चक्र ह्या मध्ये संबंध नक्की आहेच, पण तो गूढ आहे, फक्त बौद्धिक नाही. ज्या प्रकारची जाणीव शक्ती असते, त्या रूपाचे संबंध चक्र विचार निर्माण करते, किंव्हा तशी विचार करत राहते. 

विचार ही साखळीतून आलेली क्रिया आहे. म्हणून साखळी काय हवी, आणि तिने काय दाखवायला हवे, ते आपण ठरवावे, कारण साखळी एक रूप दर्शवत राहणार आहे आणि तसे आपले स्मरण होणार आणि तशी प्रतिक्रिया. तरीही साखळी कुठून येते, ह्याचे उत्तर आहे _जाणीव_ किंव्हा आणखीन सूक्ष्म शक्ती. सूक्ष्माचा स्वभाव निराळा असतो आणि तो वेगळे चक्र साकार करतो, अस्तित्वच वेगळं स्मरण प्रकट होत, म्हणून आपण सूक्ष्म व्हावे. थोडक्यात _अस्तित्व_ जाणणे म्हणजे त्याचे स्तर असतात जाणिवेचे. 

प्रत्येक जीव जाणिवेचे रूप घेऊन आला असतो आणि त्या प्रमाणे अर्थ मांडतो जीवनाचा. मला तुझे रूप माझ्या रूपावरून दिसणार आहे आणि तुलाही माझे रूप तुझ्या रुपावरून. ह्याचा सरळ अर्थ असा आहे की प्रत्येकाचा सूक्ष्म होण्याचा प्रवास आहे, जो त्याला करू द्यावा. त्या प्रक्रियेत पूर्णत्वाचा अर्थ मला जरी माहित नसला, तरीही आपण प्रवासात आहोत, हे ध्यानात ठेऊन शांत राहू शकतो. कधी न कधीतरी शांती लाभेल, ही श्रद्धा बाळगावी. 

वरील सांगणे सोपे आहे, तितकेच अरचरणात येऊ देण्याला वेळ देणे महत्वाचे आहे. किती जन्म लागतील, किती रुपात आपण वावरू, कुठे जाऊ, काय धरण होईल हे सगळ अनुभवात येऊ पाहणार आहे. त्याला सामोरे जाणे शांतपणे. माझ्यातील गुंता ह्याचे स्वरूप मला माहिती आहे आणि तुला ही वेगळ्या पद्धतीने माहिती आहे. पण शेवटी आपण दोघेही गुंता म्हणून एकमेकात वावरतो! कुणी कुणाला समजावे?!! म्हणून जीवाचा गुंता हा संतांना बरोबर दिसतो आणि त्याचे ऐकणे आपल्या हिताचे ठरते. 

मनाचे स्वरूप धारण करण्याचे आहे. गोष्टीचे संस्कार होऊन आपण तसे त्यात गुंततो आणि त्या गोष्टीला खरे मानतो, विषय बनवतो. हा मनाचा स्वभाव आहे, त्याच्यातून कुणीही सुटलेलं नाही. तसेच भगवत स्वरुप आपण होण्याचा प्रयत्न करू. 

क्रिया, कार्य, बदल, सांगणे, न सांगता येणे ह्या सर्वांना महत्वाचे घटक समजा प्रवासातले. ते येणार. त्याला त्रासुन न जाणे.

चिंतन करत राहणे. त्याचा परिणाम व्यवहारात कसा होईल, ते श्रद्धेने स्वीकारावे. 

हरि ओम.

No comments:

Post a Comment