Saturday, 21 June 2025

श्री

 श्री 


प्रत्येक व्यक्तीला पूर्णत्वचा शोध आहे. कदाचित तो उपजत भाग असावा जीवाच्या शक्तीचा. म्हणून आधार अनुभवण्याची गरज आणि कायम तळमळीची भावना ह्या दोन गोष्टी असाव्या अनुभवात. इथे नोंद घ्यायला हवी, परत, की _अनुभव_  ही अस्तित्वाने निर्माण केलेली क्रिया आहे, तसे ते कार्य करत राहणार. अस्तित्वाचा तो स्वाभाविक गुण असल्यामुळे, तो कार्य करत राहणार, म्हणून क्रिया करणार आणि त्याचं प्रतीक म्हणजे अनुभव निर्माण होत राहणार. 

निर्मिती प्रक्रियेला सुरुवात, मध्य आणि शेवट तसे नाही. ते चक्र असावं, म्हणून त्याच भाषेची संकल्पना म्हणजे _शांत_ होणे असे आहे. त्या चक्रातून किंव्हा त्या चक्रामुळे जे जे काही अनुभवात प्रकट होईल, ते विलीन करणे आहे. विलीन म्हणजे पूर्णत्वकडे वाटचाल. म्हणजे शुद्ध जाणीव. म्हणजे भगवंताचे दर्शन.  

अस्तित्व शक्तीला जीवासाठी चक्राच्या भाषेत समजून घ्यायला लागत असावं. नाम घेत गेल्याने चक्राची परिभाषा बदलते, ती अधिक सूक्ष्म होते, विशाल होते, परिवर्तन पावते आणि शेवटी स्थिरावते. परिवर्तन कसे ओळखावे? अनुभवाचे रूप बदलत गेल्यावर, नामाचा योग्य परिणाम होत आहे, असे ओळखावे. 

आपण ज्याला आयुष्य म्हणतो, ते शक्तीचे कार्य आहे, चक्र आहे. त्यात शांत होणे, म्हणजे सध्याच्या चक्रेच्या परिणामात परिवर्तन करणे, म्हणजे वृत्ती विलीन होणे. 

हरि ओम.


श्री 

अनुभवात नाविन्य, स्थैर्य, विलीनता, वैराग्य असे घटक प्रत्येकाच्या जीवनात येत असावे. त्याचे रूप, आकार, परिस्थिती अनेक, पण सर्व विविध परिस्थितीच्या पोटाशी काही सार्वजनिक महत्वाचे आणि अंगभूत भावनांचा परिणाम होत असावा. 

जी काही इंद्रियांच्या भाषेत विविधता दिसून येते, ती वरवरची असते. त्याच्या मुळाशी, जिथे जाणिवेची परिभाषा कळते, तिथे सर्व सामान्य, सामूहिक, भावना असाव्यात, जे दृश्यात हालचाली घडवतात. 

मग हालचालींवर लक्ष का देणे, हा प्रश्न स्वतःला विचारावा. ते इतके गौण आहे, की ते नसले तरीही काही बिघडत नाही. मनाच स्वास्थ्य बिघडण्याचं कारण हे, की ते उगाचच वरवरच्या हालचालींना जास्ती मुल्य देतं राहतं. तर तसं करू नये. त्यासाठी नामस्मरण करावे.

हरि ओम.

No comments:

Post a Comment