Wednesday, 29 October 2025

श्री

 श्री 


"आपण" हा भाव होणे, हा एक प्रकारचा संबंध आहे अस्तित्वात होऊ पाहणारा...त्यात वृत्तीतून ते विचार धारा ते भावना ते देह ते दृश्याशी संपर्क अशा घटकांमधून संबंध प्रज्वलित होत राहतो. संबंध, हा इथे _शब्द प्रयोग_ वापरला आहे, त्याचा अर्थ खूप गूढ आहे आणि प्रवाह आणि स्मरण दर्शवतो. आपल्याला हे सर्व वरील कार्य "स्मरण" म्हणून अनुभवात येतं राहतं आणि त्याला आपण सत्यपणा देतो किंव्हा धरुन ठेवतो, त्याला मूल्य देतो, त्याचे परिणाम भोगतो, त्याला विषय करतो, त्याची चिंता करतो वगैरे..

कधीतरी वरील कार्याची जाणीव व्हायला सुरुवात होते आणि मग प्रश्न पडायला लागतो की शुद्धता म्हणजे काय आणि ती कशी आत्मसात करावी? तिथून नामस्मरणाला सुरुवात होते. 

कार्य अनेक स्तरात स्थित असते आणि आपल्या पलीकडे कार्य असणे, ह्याची जाणीव नामस्मरण करून देते. त्या कार्य पर्यंत जाण्याची शक्ती (म्हणजे परिवर्तन) नामस्मरण करून देते, असे संतांचे सांगणे आहे. नामस्मरणावर श्रद्धा बसायला वेळ देणे जरुरी आहे, ते त्वरित होणे कठीण आहे. 

ज्या पद्धतीने आपण वावर करतो, ती सवय खूप काळापासून आलेली असते, म्हणून तिला शांत करण्यास वेळ देणे जरुरीचा आहे. मौज अशी आहे की शांत होणे हा उलटा प्रवास आहे, म्हणून बुद्धीचे परिवर्तन होणे आहे...म्हणजे गनिमी काळापासून जो स्वभाव बुद्धीचा झाला आहे, तो "सोडून देणे" (त्यात परिवर्तन होणे) अभिप्रेत आहे. ते सोडून देताना श्रद्धा भक्कम लागते, जी सर्व शंकेतून पलीकडे नेईल स्वतःला. शंका येणे साहजिक आहे, कारण शांत होण्याची सवय बुद्धीला नसते. त्याचे विश्लेषण करून श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, की मार्गात गोष्टी चांगल्या असल्या का वाईट, त्याने जर आपण त्यात गुंतलो तर ते घातकच ठरते. 

त्या विश्लेषणाचा सरळ अर्थ असा की मनाने स्थिर व्हावे, विचार धारा येऊ देणे आणि जाऊ देणे, कर्तव्य करणे, कार्य भाव ओळखणे, प्रारब्ध आणि भोग कसेही जरी वाटले, तरीही नाम घेणे सोडू नये, श्रद्धा वाढवणे, भगवंताच्या इच्छेने सर्व काही होते, हे ओळखणे...

हरि ओम.

No comments:

Post a Comment