Wednesday, 27 May 2026

श्री

 श्री 


भगवंताचा _प्रश्न_ (महत्व, गरज, प्रयास, श्रद्धा, मार्ग, कृपा) निर्माण किंव्हा स्थित व्हायला कारण गूढ असते. कशातून ती गरज निर्माण होते, हे सांगणे कठीण...भगवत कृपा म्हणावी. 

जीव असा प्राणी आहे, की त्याला स्वतःच्या स्तराची, संबंधांची, परिणामांची, भोगाची, कार्याची जाणीव असते/ प्रखर करता येते. म्हणून त्याला पडणारे प्रश्न औरच असतात! त्या प्रश्नातून शोध स्थित राहतो, तो नंतर मार्ग बनतो आणि शेवटी सत्य दर्शनास आणतो. 

प्रश्नाची रचना आणि तिला साजेल असे उत्तर रेषेसारखे सरळ नसतात बहुतांश. सरळ नाही म्हणजे ते विचारांच्याही पलीकडे स्थित असते. अपुरेपण, तात्पुरतेपण, वेगळेपण - हा भाव सर्वांगीण सर्व स्तरात पसरलेला असतो किंव्हा स्थित असतो. म्हणून विचारांच्या शक्तीवर समाधानकारक उत्तरे सामावलेले नसतात. 

दररोजच्या दृश्यात वावरताना हालचाली हे टप्पे किंव्हा निमित्त मानावे. म्हणजे त्यांचा परिणाम शांत होण्यासाठी व्हावा, नाही की व्याकुळता प्रस्थापित होण्यासाठी. 

प्रत्येक जीवाचे त्याचे त्याचे रूप असते, विचारांची पद्धत असते. त्यातून मार्ग आत्मसात व्हावा लागतो. प्रत्येकाच्या वाट्याला प्रवास आहे, त्याला तो पत्करावा लागतो, त्याचे देणे असते, तो स्वीकारावा लागतो, त्यात कार्य करावे लागते, त्यात शरण जावे लागते. सैय्यम ठेवावा आणि शांत व्हावे.

हरि ओम.




श्री 

व्यवहार किंव्हा द्वैताशी संबंध प्रस्थापित होणे आणि स्वतःशी/ अंतर्मुख होण्यात संबंध प्रस्थापित होणे, ह्यांचे त्या त्या स्थितीत परिणाम होत राहतात आणि एकमेकांशीही संबंधित असतात. 

त्याकडे शांतीने नुसते बघावे. त्यातून काही अभिप्रेत असते का? काही मिळवायचे असते का? काही हेतू असायला हवा का? हे प्रश्न त्वरित संपणे अशक्य. ते प्रश्न असतात, म्हणून नकळत सत्याचा शोध होत राहतो. जीवात शोध, _हे कार्य_, स्थित असते, म्हणून शांतीचे दर्शन कधी ना कधीतरी होणार. त्यावर श्रद्धा ठेवावी. 

हरि ओम.

No comments:

Post a Comment